‘‘सिंहलद्वीपात इंद्र एक मोठा यज्ञ करील. त्या वेळेस त्या समारंभाला विष्णू, ब्रह्मदेव, शंकर व सर्व श्रेष्ठ देव येतील, त्यांच्या बरोबर नवनाथही येतील. तेव्हा आता शोक सोडून विमानात बसून सिंहलद्वीपात चल.’’
मैनाकिनी जाणार म्हणून सर्व स्त्रियांना फारच दुःख झाले. जातांना तिने सर्वांची समजूत घातली व दैर्भामेस व्यवस्थितरीतीने राज्य चालवून सर्वांना सांभाळण्याचा उपदेश केला. नंतर तिला सिंहलद्वीपात पोचवून उपरिक्षवसू आपल्या स्थानी गेला. अशा तर्हेने मैनाकिनी शापमुक्त झाली.
इकडे मच्छिंद्रनाथ हिंडत हिंडत गौडबंगाल्यात आले. तिथे त्यांची कानिफाशी भेट झाली. तेव्हा ‘‘आपल्याला या पुण्यवान माणसामुळे गुरूंची भेट झाली’’ असा विचार मनात येऊन गोरक्षनाथ मीननाथाला खाली उतरवून कानिफनाथांच्या पाया पडले.
भेटतांना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी कारण विचारले. गोरक्षनाथांनी जालिंदरास गोपीचंद राजाने पुरल्याची हकिगत सांगितली.
ते ऐकून मच्छिंद्रनाथ मनातून रागावले. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीत – हेलापट्टणास पोचले.
गावातील बरीच मंडळी त्यांना भेटली. कानिफनाथाने जालिंदरास वर काढल्यापासून मुक्तचंद राज्यावर बसेपर्यंतची हकीकत सांगितली. मच्छिंद्रनाथांनी ‘‘राज्यकारभार कोण चालवतो?’’ असे विचारताच गावकऱ्यांनी ‘‘तो मैनावतीच्या मार्फत’’ असे सांगितले. गावकर्यांनी मैनावतीची खूप स्तुती केली.
मच्छिंद्रनाथांचा व जालिंदरनाथांचा परस्पर संबंध जरी दाखविला नाही, तरी ते गुरुबंधू होते आणि मुळचे नवनारायण होते. त्यांच्या दैनंदिन आन्हिकात त्यांना सृष्टीवर कुठे काय सुरू आहे हे अंतर्ज्ञानाने माहीत होतं.
नाथपंथाच्या विभूतीला लिदीत पुरले याचा त्यांना राग आला; परंतु कार्य स्वतंत्र असल्याने काही ढवळाढवळ केली नाही, फक्त जाणून घेतले.
गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले. द्वारपालाने आत जाऊन ‘‘कोणीतरी योगी दोन शिष्यांसह आले आहेत’’ असे सांगितले. त्यांचे वर्णन विचारताच ‘‘ते हुबेहूब जालिंदरनाथांसारखे दिसतात’’ असे सांगितले.
हे ऐकताच प्रधान व मंडळींसह मैनावती त्यांना सामोरी गेली. तिने त्यांना मंदिरात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसवून षोडशोपचार पूजा केली व म्हणाली:
‘‘आपले पाय येथे लागल्याने मी धन्य झाले.’’
मच्छिंद्रनाथ म्हणाले:
‘‘मी उपरिक्षवसूचा मुलगा. दत्तात्रेयांनी मला अनुग्रह दिला. जालिंदरनाथासही त्यांनीच उपदेश केला. तो माझा धाकटा गुरुबंधू. त्याला इथे त्रास झाला हे ऐकून मी रागाने आलो होतो; पण सर्व प्रकार गावकऱ्यांकडून कळले आणि माझा राग शमला. तुझ्या उत्तम गुणांमुळे तू धन्यता मिळवलीस – बेचाळीस कुळे उद्धरलीस.’’
मैनावती त्यांच्या पाया पडली व म्हणाली:
‘‘महाराज, हे सर्व आपल्या कृपादृष्टीनेच झाले आहे. परिस लोखंडाला सुवर्ण करतो; पण तुमचे औदार्य त्याहून अधिक आहे.’’
हेलापट्टणाहून निघाल्यावर नाथ तिघे जगन्नाथपुरीस गेले. तेथे तीन रात्री राहिले. तीर्थविधी करून नंतर सौराष्ट्रात वस्तीला राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेसाठी गेला. मीननाथ निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथांनी त्याला शौचास बसविले.
तेवढ्यात गोरक्षनाथ परत आला. मच्छिंद्रनाथांनी त्याला मीननाथास धुऊन आणण्यास सांगितले. मीननाथ लहान असल्याने त्याचे हात–पाय घाण झालेले पाहून गोरक्षनाथाच्या मनात आले:
‘‘सन्न्याशाला हा खटाटोप कशाला?’’
रागाच्या भरात तो मीननाथाला घेऊन नदीवर गेला व एका दगडावर आपटून त्याचा प्राण घेतला.
त्याने हाडे–मांस मगरी, माशांना दिले आणि कातडे धुऊन वाळत घातले.
मच्छिंद्रनाथ तेथे नसताना हे घडले. परत येऊन विचारल्यावर ‘‘त्याला सुकत ठेवले आहे’’ असे गोरक्षाने सांगितले. पण बाहेर नेऊन कातडे दाखवता मच्छिंद्रनाथ धाडकन कोसळले, रडू लागले, डोके आपटू लागले, कातडे हाती घेऊन त्याच्या गुणांचे वर्णन करू लागले.
नाथ योग्यांना जीवन–मरण गौण. पंचतत्त्वांचा देह हवा तसा घ्यायचा; नको झाला की पंचतत्त्वात विलीन करायचा — हेच दत्तात्रेयांचे वैशिष्ट्य. त्यामुळे गोरक्षनाथांच्या दृष्टीने ‘‘मारणे’’ वा ‘‘मरण’’ अशी संकल्पना नव्हती. हे सर्व गुरु–शिष्य परीक्षेचा भाग होते.
गोरक्षनाथ म्हणाले:
‘‘गुरुराज, तुम्ही अशा अज्ञानात का शिरता? शाश्वतास मरण नाही. मीननाथ कधीही मरणार नाही.’’
मच्छिंद्रनाथाचा शोक न थांबताच गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र वापरला. भस्माची चिमूट कातड्यावर टाकताच:
मीननाथ पुन्हा उठून उभा राहिला आणि मच्छिंद्राच्या गळ्यात पडला.
कातड्याशिवाय काहीच नव्हते; तरी केवळ ‘‘शरीराच्या खोळीवर’’ आधारून त्याला जीवंत केले — हे विज्ञानालाही शक्य नाही.
मच्छिंद्रनाथ त्याला प्रेमाने बिलगले.
पुढे गोरक्षनाथ विचारतात:
‘‘तुमच्याकडे निर्जीवाला सजीव करण्याची शक्ती असताना आपण रडलात का?’’
गुरु म्हणाले:
‘‘तुझे आशा, तृष्णा, क्रोध तुझ्यात कितपत आहेत हे तपासण्यासाठी मी हे केले. शाश्वत–अशाश्वत तुला कळले आहे की नाही हे पाहिले. आता मला खात्री झाली — तू मला पाहिजे तसा घडला आहेस.’’
अशा प्रकारे गुरु–शिष्यांनी परस्पर परीक्षा घेऊन खात्री केली आणि पुन्हा पंथकार्याला लागले.